रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील जेएसडब्ल्यू जयगड पोर्टचे वरवडे येथील माध्यमिक विद्यालय, पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय, मालगुंड येथील शिरीष मुरारी मयेकर विद्यालय, बळीराम परकर विद्यालय, चाफे येथील सुनील मुरारी मयेकर कनिष्ठ विद्यालय येथे जीवन कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. सोनाली कदम आणि माणिक बाबर यांनी मार्गदर्शन केले.
मुलींना मार्गदर्शन करताना डॉ. कदम यांनी टीव्हीवर लागणाऱ्या मालिका आणि खरे आयुष्य यात अंतर असल्याचे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, ‘मनोरंजन म्हणून कार्यक्रम पाहणे वाईट नाही; परंतु सवय म्हणून मालिका पाहू नयेत. काहीतरी बोध मिळणारे कार्यक्रम जरूर पाहावेत. फेसबुकसारख्या माध्यमातून मुलींच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण होतो. आपण जे काम करतो त्यापासून पैसा मिळवण्यापेक्षा आत्मिक समाधान किती मिळेल हे महत्त्वाचे आहे. आपल्याला आयुष्यात काय व्हायचे आहे हे ठरवून त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत.’
‘आपल्याला आत्मभान असेल, तर आपण आपले ध्येय गाठू शकतो. आपण अभ्यास करताना वाचन करतो त्यावर विचार करून त्यावर व्यक्त झाले पाहिजे. स्वतःची काळजी आपण स्वतःचा घेऊ शकतो. योग्यवेळी नाही म्हणणे, घरातल्यांसोबत संवाद साधणे पुढच्या अडचणींना आळा बसवू शकतो,’ असा देताना डॉ. कदम यांनी मुलींना आत्मभान, संप्रेषण या कौशल्यांवर आधारित अनेक उदाहरणे देऊन प्रोत्साहन दिले.
बाबर यांनी मुलांचे समुपदेशन करताना लैंगिक, सामाजिक, भावनिक बदल, प्रेम, आकर्षण, मैत्री, लैंगिक समस्या व आजार, स्मार्टफोन आणि पालकांशी संवाद अशा अनेक विषयांवर मुलांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘कुमार अवस्थेत आपल्या अस्तित्त्वाची दखल घ्यावी असे वाटत असते. हे वय म्हणजे मानसशास्त्राच्या भाषेतील तणाव व वादाचा काळ या अवस्थेतून सहीसलामत बाहेर पडलात, तर आयुष्य जगणे अवघड होऊन बसते. म्हणजेच नको असलेल्या चुका होणे, व्यसनांच्या आहारी जाणे आदी. यासाठी आपल्या पालकांशी संवाद साधने गरजेचे आहे.’
जेएसडब्ल्यू जयगड पोर्टचे युनिट हेड रवी चंदेर व सीएसआर प्रमुख सुधीर तैलंग यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी सर्व शाळांचे मुख्याध्यापक श्री. देशमुख, श्री. बंजोळे, विनायक राऊत, प्रमिला कुळ्ये, शाळेतील शिक्षक यांचे विशेष सहकार्य लाभले. सई साळवी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. त्यांना सौरभ पतयाने, सागर जोग व दर्शना रहाटे यांनी सहकार्य केले.